मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले किंवा अटकेपार झेंडा फडकावला या म्हणी तर आपणा सर्वांना अगदी परिचित आहेत.
पण कधी प्रश्न पडलाय का की हे अटकेपार झेंडे लावणे हे काय प्रकरण आहे?
काय आणि कुठे आहे हे अटक?
हल्ली अटक हे अटक खुर्द म्हणून ओळखलं जातं. हिमालयात उगम पावणाऱ्या व उत्तरेत पाकिस्तानातून वाहणाऱ्या ऐतिहासिक अशा सिंधू नदीच्या किनारी हे शहर वसलेलं आहे.
आपणा सर्वांना महाभारतातील कौरवांची आई गांधारी तर माहीतच असेल. ती गांधारी ज्या देशाची किंवा राज्याची राजकन्या होती तो देश म्हणजे गांधारदेश जो की आत्ताचा अफगाणिस्तान आहे.
पुराण कथांमध्ये त्यामुळे वारंवार त्या निमित्ताने अटकचा उल्लेख येतो.
अफगाणिस्तान मधून तेव्हाच्या भारतभूमीत यायचे म्हणजे एक मोठा अडथळा असायचा तो म्हणजे हिंदुकुश पर्वतरांगेचा. तसा हा भौगोलिक दृष्ट्या खडतर प्रदेश म्हणावा लागेल.
त्यामुळे तिकडून व्यापाऱ्यांना, सैनिकांना, सरदारांना भारतात व्यापारासाठी किंवा युद्धासाठी यायचे म्हटले तर हिंदुकुश पर्वतरांगेमधील खैबर खिंड ओलांडून यावे लागायचे.
त्या खैबर खिंडीचा शेवट पेशावरला होतो आणि पेशावरपासून थोडं खाली उतरताच अगदी हिंदुकुश पर्वताच्या पायथ्याशी अटक खुर्द हे गाव वसलेलं आहे.
या गावाला अटक हे नाव मुगल सम्राटअकबराने दिले असून परकीय आक्रमणाला भारतात येण्यापूर्वीच तिथे रोखले जावे म्हणून तिथे एक किल्लाही सिंधू नदीच्या काठी बांधण्यात आला. जो आजवर टिकून आहे. अटकचा अर्थ अडथळा असा होतो.

त्यात परवेझ मुशर्रफ यांनी नवाज शरीफ यांना पाकिस्तानच्या पंतप्रधान पदावरून हटवून याच किल्ल्यात नजरकैदेत ठेवले होते शिवाय असिफ अली झरदारी यांना देखील काही काळ इथे कैद करून ठेवण्यात आले होते.
त्यामुळे या ऐतिहसिक किल्ल्याचं महत्त्व आत्ताच्या काळातही तसेच टिकून आहे.
मग अटकेपार झेंडे रोवले, फडकावले ही म्हण कशी तयार झाली?
त्याचं झालं असं की १८व्या शतकापर्यंत पेशावरवर व अटकेवर मुघलांचं वर्चस्व होतं. पण जेव्हा दुर्रानी घराण्याचा अहमद शाह अब्दाली अफगाणिस्तानचा सुलतान बनला तेव्हा त्याने अटके वर असलेलं पंजाब सुभेदारांचं वर्चस्व उलथवलं आणि तो आपलं सैन्य घेऊन भारतात आला आणि लुटालूट करून गेला.
नंतर त्याचा हा क्रम सुरूच राहिला कारण तेव्हा भारतात मुघल सत्ता खिळखिळी झालेली होती.
हे पण वाचा:
नेटकऱ्याने विचारले नीरजला ही गाडी देणार का? आनंद महिंद्रा म्हणाले..
महिंद्राची नवीन बोलेरो येतेय.जाणून घ्या काय आहेत फीचर्स.
सोनालीच्या बिकीनी फोटोने नेटकरी झाले घायाळ
अब्दाली अफगाणिस्तानातील अंतर्गत कलह शमविण्यासाठी परत गेला व अटकेला आपला पुत्र तैमूर दुर्रानी याला ठेवून त्याला पंजाबची सुभेदारी सोपवली.
अब्दालीला पायबंद घालण्यासाठी नानासाहेब पेशवे यांनी मोहीम आखली आणि आपला भाऊ रघुनाथराव पेशवे उर्फ राघोबादादा यांना त्या मोहिमेवर पाठवले. अखंड भारतात त्यावेळी अब्दाली सोबत जर कुणी भिडू शकत होतं तर ते मराठे होते.

सोबतीला त्यांनी होळकर व शिंदे यांसारखे लढवैये सरदारही देऊ केले. हळूहळू त्यांच्या ताब्यातील एकेक प्रदेश हस्तगत करत त्यांनी पुढे कूच सुरूच ठेवली होती.
मुघलांना असलेला अब्दालीचा राग लक्षात घेता त्यांनी यात मराठ्यांना मदत केली. शेवटी शीख, मुघल आणि मराठे एकत्र लढून त्यांनी अटक काबीज केलं.
रघुनाथराव यावर थांबणारे नव्हते त्यांनी अटकेच्या ही पलिकडे जाऊन पेशावर वर चढाई केली आणि अब्दालीचा पुत्र तैमूर दुर्रानीला तिथून पळवून लाऊन पेशावर देखील काबीज केले.
तारखांबद्दल थोडे मतभेद असतीलही. कुणी म्हणतं १८ एप्रिल १७५८ तर कुणी १० ऑगस्ट १७५८ पण पराक्रम झाला एवढं मात्र नक्की.
आता पेशावरवर मराठ्यांचा भगवा दिमाखात लहरत होता. दिल्लीवर ही भगवा लहरत होता. तो काळ मराठ्यांच्या साम्राज्याचा अत्युच्च काळ होता.
आणि तेव्हाच ही म्हण प्रचलित झाली की मराठ्यांनी अटकेपार झेंडे रोवले.!